मुंबई : ‘भाजप राज्यात प्रथम क्रमांकाचा पक्ष बनला असून पक्षाच्या सामर्थ्यामध्ये अनुसूचित जाती मोर्चाचा वाटा महत्त्वाचा आहे,’ असे प्रतिपादन भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार विनोद सोनकर यांनी केले.
भाजप प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाच्या दोन दिवसांच्या अभ्यासवर्ग व प्रदेश कार्यसमिती बैठकीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या वेळी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अमर साबळे, खासदार डॉ. सुनील गायकवाड, आमदार विजय गिरकर, डॉ. मिलींद माने, रमेश बुंदिले, रामचंद्र अवसारे, सुधाकर भालेराव, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सोनकर यांनी सांगितले की, ‘भाजपच्या केंद्र व राज्य सरकारने सामाजिक न्यायासाठी अनेक निर्णय घेतले असून महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत. आपल्या सरकारच्या योजना समाजापर्यंत पोहचविण्याचे काम अनुसूचित जाती मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे. तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत सरकारचे काम न्यावे व अंत्योदयाचा विचार अंमलात आणावा.’
राजकुमार बडोले यांनी सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. दिलीप कांबळे यांनी भाजप मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पाठबळ देत असल्याने नमूद केले.
सुभाष पारधी म्हणाले की, ‘भाजपच्या सरकारने केलेल्या विकासकामांचे महत्त्व राज्यातील अनुसूचित जातीच्या लोकांना पटले आहे. राज्याच्या प्रत्येक गावात अनुसूचित मोर्चाच्या शाखा उघडाव्यात.’
कार्यशाळेत एकूण आठ सत्रात विविध विषयांवर भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, खासदार अमर साबळे, प्रदेश सरचिटणीस डॉ. रामदास आंबटकर, आमदार भाई गिरकर, दीपक जाधव (चिपळूण) आणि अमित गोरखे (पुणे) यांनी मार्गदर्शन केले. कार्यसमिती बैठकीस दोनशे प्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल रामनाथ कोविंद यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव बैठकीत मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव चंद्रकांत हिवराळे यांनी मांडला.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन अशोक कानडे यांनी केले. आभार सुखदेव अडागळे यांनी मानले.